Monday 22 June 2020

वेळा




गेलेली वेळ कितीही पैसे मोजले तयारी विकत घेता येत नाही आणि आलेल्या योग्य वेळेचा योग्य तो उपयोग करुन तीच फायदा घ्यायचा असेल तर त्या वेळेसाठी एक पैसाही खर्च करावा लागत नाही. पण वेळ यावी लागते. वेळ कधीही सांगून येत नाही. वेळेचा सदुपयोग करा. कालापव्यय करु नका. वेळेला खूप महत्व आहें. Time is Money. वेळ आयुष्यात फक्त एकदाच येते. "बखत पडा बाका तो गधे को कहना काका", "काळ आला होता पण वेळ आली नव्हती". गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही. वेळेला महत्व द्या. आपली कामे ठरलेल्या वेळेनुसार करा. ठरलेल्या वेळेतच करा. कधीही विलंब लावून नका. उद्यावर तर ढकलूच नका. कारण आजचा उद्या उजाडल्याबरोबर आज होणार आहे. Tomorrow has no end. तेच "कल करे सो आज कर आज करे सो अब कर" आलेल्या सुसंधीचं स्वागत करा. यश तुमचंच आहे. अशा तऱ्हेची अनेक वाक्ये आपल्या कानावर नेहमीच पडत असतात. अन ते खरंही आहे. 

पण आपल्या सर्वांच्याच आयुष्यात नियमितपणे येणाऱ्या मुख्य म्हणजे दररोज दोन वेळा खूप महत्वाच्या आहेत. १. सूर्यास्ताची संध्याकाळ व २. सूर्योदयापूर्वीच्या पहाट. दिवसाला निरोप देणारी आणि थोड्या वेळाने रात्रीला सुरुवात होईल असे सांगणारी एक वेळ असते. तिला करकरीत 'तिन्ही सांज' म्हणतात. सूर्य मावळण्याच्या बेतात असतो; तास अंधार पडलेला नसतो पण थोड्याच वेळात पडणार असतो. ना उजेड ना अंधार अशी ती वेळ असते. तिला संध्याकाळ म्हणतात. ती कातर वेळ असते. मनाला हुरहूर लावणारी, अस्वस्थ करणारी, उगाच जीव खाली वर करणारी, घरात कुणी आजारी असलं तर; छोटं बाळ असलं अन ते रडत असलं तर मनाला भेडसावणारी हि वेळ असते. ती आपण सुंदर, पवित्र कार्याची असते. आपण ती करु शकतो. १० देव्हाऱ्यातील देवाजवळ दिवा लावून, २) भगवंताचे स्तवन करुन...

शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदा ।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते ।।

तसंच

दीपज्योतिः परब्रह्म दीपज्योतिर्जनार्दनः ।
दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोऽस्तु ते ।।
संध्यादीपं नमोस्तुते । संध्यादीपं नमोस्तुते ।

हि त्रिवार प्रार्थना दिव्यासाठी आणि पुढील श्लोक भगवंताचे मनापासून स्तवन करण्यासाठी 

शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् |
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् ||
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् |
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् || 

देवाजवळ सुगंधी उदबत्ती लावली कि, देवघरच काय संपूर्ण घरच पवित्र्याने भरुन जातं. एकदम प्रसन्न वाटतं. घरातील ज्येष्ठ व्यक्ती, गृहिणी, अर्थार्जन करणारा घरातला करता पुरुष, घरातील बाल-गोपाळ मंडळी ह्या सर्वांना सांज वेळ सांगते - देवाचं नामस्मरण करा. मनात चांगले विचार आणा. स्वतःशी प्रामाणिक राहा. कुणाला फसवू नका. कुणाचेही वाईट चिंतू नका. मी कशीही असले तरी ही लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते, तिच्या स्वागताला वास्तुपुरुष सजग असतो आणि तो तथास्तु म्हणतो आणि म्हणूनच देवाची मनापासून प्रार्थना करा. 
दिवसाला निरोप देणारी आणि रात्रीचे स्वागत करणारी ही संध्याकाळची वेळ फार महत्वाची असते, ती सर्वांना सांगते, "दिवसभर घरासाठी, प्रपंचासाठी श्रम करुन थकलेल्या माणसा, येणाऱ्या रात्री गाढ झोप. झोप येण्यासाठी, संपूर्ण विश्रांती घेण्यासाठी, दुसरे दिवशी ताजे-तवाने होऊन नव्या दमाने प्रामाणिकपणे कष्ट करण्यासाठी तू ह्या तिन्ही सांजेला दिवसाच्या २४ तासातले ५ मिनिटे देवासाठी दे. देवाची आठवण कर. एकदा देवघरातील सर्व देवांकडे डोळे भरुन पाहुनघे आणि नंतर शांतपणे डोळे मिटून देवाला हात जोडून अगदी निरिच्छ मनाने काहीही न मागता मनापासून नमस्कार कर"

सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु, माँ कश्चिद् दुःख माप्नुयात॥

हे तू घरी, बाहेर, ऑफिसमध्ये, प्रवासात, बागेत कुठेही करु शकतो. परमेश्वराची फक्त आठवण करायची. जशी छोटं बाळ ज्या निरागसतेने आपल्या आईची करते अगदी तशीच. 

तसंच रात्रीला निरोप देऊन येणाऱ्या दिवसाचं उत्स्फूर्त स्वागत करणारी सुद्धा एक वेळ असते तिला पहाट म्हणतात, पहाटेची वेळ माणसाला नवीन झालेली असते. सूर्योदय झालेला नसतो. नुकतीच उजाडायला सुरुवात झालेली असते. बाहेर प्रसन्न वातावरण असतं. पहाट-वारा मंद वाहत असतो. पक्षांना जाग आली असते. फुलंही उमलू लागतात. रात्र नुकतीच संपलेली असते. पहाटेचा झुळूझुळू वाहणारा वारा शरीराला नवी उभारी देतो. माणसाचं मन प्रसन्न करतो. घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची झोप उजाडण्यापूर्वीच पूर्ण झालेली असते. ते आपल्या शय्येवरच उठून बसतात. देवाला आळवतात. भूपाळी व भजनं म्हणतात. त्यांच्या गोडं वा कशाही आवाजाने संपूर्ण घर पवित्र्याने भरुन जातं. देवळामध्ये घंटानाद होतो. देवळाचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सेवक नामस्मरण करीत साफसफाईला सुरुवात करतात. थोड्याच वेळात देवाला उठविण्यासाठी काकड आरतीला सुरुवात होते. सगळीकडे प्रसन्न आणि पवित्र वातावरण असतं. आईच्या कुशीत झोपलेल्या तान्ह्या बाळालाही जाग येते. ते चुळबुळ करुन रडका आवाज काढून आईला जगवतं. त्याची भूक भागल्यावर ते हातपाय हालवित स्वतःच्या मनाशीच खेळत असतं. हॉ, ऊ असे कसले तरी आवाज मोठ्याने काढायचा प्रयत्न करीत आईच लक्ष आपल्याकडे वेधून घेतं. आई तृप्त होऊन त्याच्याकडे बघत असते. 

आता घरातले सगळेच उठायच्या तयारीत असतात. त्यांनाही आपापल्या कामाला लागायचे असते. ही सकाळची वेळ खूप शुभ व प्रसन्न असते. तिच्याही आपल्याकडून काही अपेक्षा असतात. ती म्हणते, "बाबा रे, आता सूर्योदय होईल, गृहिणी सडासंमार्जन करुन घरातल्या कामाला सुरुवात करतील. करता पुरुष, वडीलधारी माणसं, मुलं, बाळ सगळीच आपापल्या कामाला लागतील. पण हे सगळं करायला मी तुम्हाला शक्ती दिली आहे हे लक्षात ठेवा. ह्याची जाणीव ठेवा. तुमची सगळी कामे आटोपून तुम्ही घरी याल तेव्हा तुम्हाला माझा विसर पडलेला असेल. पडू दे विसर, चालेल मला. पण माझं आत्ता, ह्यावेळी एव्हढंच मागं आहे कि, अशा ह्या प्रसन्न वेळी सुद्धा ज्याने सृष्टी निर्माण केली त्या विधात्याला तुमचे आणखी ५ मिनिटे द्या. जो हे जाग चालवतो त्याच स्मरण करा. आआपलेच दोन्ही कर जुळवून त्याचे दर्शन घेऊन त्यात वास करणाऱ्या देवतांचे मनापासून स्मरण करा. 

कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती ।
करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम ॥

समुद्रवसने देवी पर्वतस्तनमंडले । 
विष्णुपत्नि नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ॥

तसेच सर्वेत्र सुखिनः सन्तु । सर्वे सन्तु निरामय:। हीच प्रार्थना पुन्हा एकदा देवाला करुन दिवसाची सुरुवात करा. तुमचा दिवस नक्की चांगला जाईल. बाकी संसारात, अडीअडचणी येतच असतात अन संपूनही जातात. सुखदुःखाचे चक्र चालूच असते. ते विधीलिखीतच आहे. पण ह्या दोन महत्वाच्या वेळेसाठी दिवसातले १० मिनिटे द्याच. कदाचित तुमचा देवावर विश्वास नसेल सुद्धा किंवा असेलही. पण सायन्स कितीही पुढे गेले असले तरी जन्म मरणाची दोरी आपल्याच हातात ठेवणाऱ्या त्या महान अदृश्य शक्तीपुढे म्हणजे परमेश्वरापुढे नतमस्तक व्हाच. मग त्याला तुम्ही देव, निसर्ग, नियती, विश्वचक्र किंवा  एखादी शक्ती असे काहीही म्हणा. 

तर अशा ह्या प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात अगदी नियमितपणे येणाऱ्या महत्वाच्या दोन वेळा पहाट आणि सांज - काळाला अलगद पुढे सरकवणाऱ्या ! 

श्रीमती सुनंदा विष्णू कुळकर्णी 
७५१७२८१६३९ 
अभिनीत मे - २०१५ 

(कृपया लेखावर कमेंट करतांना शेवटी आपल्या नावाचा उल्लेख करावा हि विनंती )

Wednesday 17 June 2020

नमस्कार !

नमस्कार हि जगातली फार सुंदर गोष्ट आहे. नम्र होण्याचा संस्कार म्हणजे नमस्कार. चुकून जरी कोणाला पाय लागला तरी नमस्कार करायची आपली भारतीय संस्कृती आहें. नमस्काराने देवसुद्धा वश होतो, मात्र नमस्कार भक्तिपूर्ण नामापासून आणि निरपेक्ष बुद्धीने केलेला असावा. 

दसरा, दिवाळी, गुढी-पाडवा, आपला स्वतःचा वाढदिवस, परीक्षेला जाताना तसेच नोकरीच्या मुलाखतीसाठी जाताना आणि अशाच काही महत्वाच्या गोष्टी करतांना आपण देवाला व घरातील वडीलधाऱ्या माणसांना आठवणीने नमस्कार करतो अन त्यावेळी घरातील आजी, आई, काका, वहिनी कोणीही आपल्या हातावर आवर्जून दही देतात. सगळं कसं छान आहे नं अगदी ! नमस्कार करणारा अगदी प्रसन्न मनाने आनंदात आपल्या कामाला जातो. 

शास्त्र सांगते, नमस्कार लहानांनी मोठ्यांना करावा. आई, वडील, गुरु, अतिथी यांना तर देव समजून नमस्कार करावा. साधू-संतांना तर लहान-मोठे कुणीही असो सर्वांनीच नमस्कार करावा. मग ते साधू संत आपल्यापेक्षा वयाने लहान असले तरी सुद्धा... आपला तो नमस्कार असतो, प्रपंचातील सर्व ऐहिक सुखाला तुच्छ मानून त्याकडे पाठ फिरविलेल्या त्यांच्या अपूर्व त्यागाला. सर्वांमध्येच देव आहे असे समजून प्रत्येकाचे कल्याण करणाऱ्या, त्यांच्यामध्ये सदैव जागृत असलेल्या त्यांच्या सत्प्रवृत्तीला...

श्रीमदभगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात -

समोऽहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः । 

मी सर्व प्राणीमात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे. मला ना कोणी प्रिय ना कोणी अप्रिय - तेव्हा अध्यात्म व परमार्थाचं म्हणणं आहे - प्रत्येक प्राणिमात्रांच्या अंतःकरणात भगवंतांचा वास असतो तेव्हा नमस्कार कुणीही कुणालाही करावा. 

मात्र विज्ञान कितीही पुढे गेले तरी जन्ममरणाची दोरी आपल्याच हातात ठेवणाऱ्या अदृश्य शक्तीला म्हणजेच परमेश्वराला (मग त्याला तुम्ही देव, निसर्ग , नियती , विश्वचक्र काहीही म्हणा) मात्र साधुसंतांसह सर्वांनीच नमस्कार करावा. त्यांच्यापुढे नतमस्तक व्हावं. त्याची मनापासून प्रार्थना करावी. 

नमस्कारात जबरदस्त ताकद असते. आपण मनातल्या मनात नमस्कार केला तरी नमस्काराचा परिणाम आशीर्वादच असतो. तो कोणालाही केलेला असला तरी, कर्तव्य म्हणून केला तरी, नुसता उपचार म्हणून केला तरी किंवा नाईलाज म्हणून अनिच्छेने केला तरी, ज्याला नमस्कार केला ती व्यक्ती वा शक्ती आशीर्वादच देते. अगदी तिच्याही नकळत तथास्तु !


श्रीमंत सुनंदा विष्णू कुळकर्णी

७५१७२८१६३९ 

(कृपया लेखावर कमेंट करतांना शेवटी आपल्या नावाचा उल्लेख करावा हि विनंती )

Saturday 13 June 2020

नातं : मानलेलं


अशोक गेंगाणे माझा भाऊ आहे. पण मानलेला. त्याला मानलेला भाऊ का म्हणावं ? हेच मला समजत नाही. पण ह्या जन्मी तो माझा मानलेलाच भाऊ आहे. पुनर्जन्म आहे कि नाही मला माहित नाही आणि असलाच तर पुन्हा माणसाचाच जन्म मिळावा इतके आपण भाग्यवानही नाही; पण का कोणास ठाऊक तरीही मला असंच वाटतं कि, गेल्या जन्मी माझी आणि अशोकाची आई एकच असावी.  

साधारण ४५/४६ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे बहुतेक १९६५-६६ साल असावं. माझं नुकतंच लग्न झालं होतं. मी विदर्भातील मुर्तिजापूरची. धुळ्याला आले. पण इकडे खान्देशात आमचे कुणीही नातेवाईक नव्हते (आमचे म्हणजे माहेरचे) त्यामुळे मनात थोडी धडधडच असायची. फारसं करमायचं नाही. घरात आम्ही दोघे आणि दोन लहान दीर. एक ८ वीत अन एक ९ वीत शिकत असलेले... शिकायला म्हणून राहिलेले. घरी नेहमी ह्यांचे मित्र व भाऊजींचे मित्र येत असायचे. त्यातल्या त्यात धाकट्या भाऊजींचे म्हणजे विजुभाऊजींचे मित्र जास्त असायचे. ओळखी व्हायच्या, तेही वहिनी वहिनी म्हणून गप्पा मारायचे. त्यातच कोण कुठले ? मी कुठली ? अशी चौकशी व्हायची. तेवढाच वेळ छान जायचा. 

आणि एक दिवस अशोक गेंगाणे आले. त्याला सहजच मी विचारले, "तुम्ही कुठले ? ( सुरवातीला तो मला वहिनीच म्हणायचा)" ते म्हणाले, " मी अकोला जिल्ह्यातील दहिहंड्याचा." मला खूप आनंद झाला. तोपर्यंत मला विदर्भातील कुणी भेटलंच नव्हतं. मी म्हटलं, "बाप रे ! म्हणजे, तुम्ही विदर्भातले आमच्या अकोला जिल्ह्यातले." तो एकदम गप्पच झाला. त्याला वाटलं मी अकोला जिल्ह्यातील दहिहंड्याचा आहे, त्यात एवढं बाप रे म्हणण्यासारखं काय आहे ? मग मीच थोडं अजीजीने म्हणाले, " का हो मग सगळेच काय वहिनी म्हणता ? कुणी तरी पाठीशी राहा. तुम्ही मला ताई म्हणा" आणि तो सहजच म्हणाला, "चालेल" तेव्हापासून मी त्याची ताई झाले अन तो माझा मोठा भाऊ झाला आणि आजपर्यंत ते नातं 'मानलेलं नातं' अबाधित आहे. एवढा काळ लोटला तरी. 

तो नेहमीसारखा येत राहिला. राखी पौर्णिमेला राखी बांधून घ्यायचा. भाऊबीजेला ओवाळून घ्यायचा. शिक्षण झालं. त्याला नोकरीही लागली नंतर त्याच लग्न झालं बायकोही चांगली मिळाली. साधी, सरळ, सुस्वभावी, सगळ्यांशी जमवून घेणारी. तिनंही आमच्या भाऊ-बहीण नात्याचा मन राखला. येणं-जाणं वाढलं. आमच्या घरातील प्रत्येक सुख-दुःखाच्या प्रसंगात त्यांचा आधार असायचा. मदत असायची. एकमेकांच्या घरातील प्रत्येक कार्य प्रसंगात आम्ही आवर्जून सहभागी होत होतो, कार्याचा आनंद घेत होतो. त्याची दोन मुलं त्यांनीही आत्या म्हणून सुखावलं. माझी तीन मुलंही त्यांना तोंड भरून मामा, मामी म्हणून हाक मारतात. माझा भाऊ म्हणून ह्यांनाही अशोकचा सार्थ अभिमान होता. 

माझं कुटुंब तर मोठं होताच. पण त्यांचंही कुटुंब बऱ्यापैकी मोठंच होतं. पण त्याच्या व माझ्या कुटुंबीयांनी आम्हाला भाऊ बहीण म्हणून स्वीकारलं होतं. आम्ही एकमेकांकडे गेलो कि ' ताई आली रे किंवा मामा आला गं ' असं वाक्य कोणीही अगदी सहज म्हणायचं.

आता आम्हाला सुना आल्या. दोघांनाही नातवंड झाली अन तरीही आम्हा दोन्ही कुटुंबातील वागणं अगदी तसंच राहिलं, किंबहुना थोडं जास्त जवळच अन जास्तच आपुलकीचं झालं. माझ्या घराच्या कार्यात भाऊ म्हणून व त्याच्या घराच्या कार्यात माहेरवाशीण म्हणून अगदी मानाने वावरते. 

इतकंच काय आजच्या पिढीतील माझी मुलं, सुना आणि नातवंड मामा, मामी आले कि आनंदून जातात आणि त्यांची मुलं, सुना मला माहेरवाशीणच मानतात. तसेच नातवंड आत्या आजी म्हणून खूप खूप आनंद देतात. 
आजच्या एक या दो बच्चे काळात बहिणीला भाऊ व भावाला बहीण असणं म्हणजे दुग्धशर्करा योगच आहे. तरीही पण भाऊ नसलेल्या बहिणीला अशोक सारखाच मानलेला भाऊ मिळावा अशी माझी त्या परमेश्वराजवळ प्रार्थना आहे.

(फोटो सौजन्य : सौ. ललितागौरी गेंगाणे)

श्रीमती सुनंदा वि. कुळकर्णी
७५१७२८१६३९
अभिनीत : ऑक्टोबर - नोव्हेंबर - २०११ (दिवाळी अंक) 

Monday 8 June 2020

पैसा


असं म्हणतात, सगळी सोंग आणता येतात पण पैशाच सोंग कुणालाही, कधीही आणता येत नाही. पैशाशिवाय माणसाला काहीच करता येत नाही. पैशांवाचून सगळ्यांचच अडतं. पैसा माणसाला दहा माणसात बसवतो आणि दहा माणसातून उठवतो सुद्धा ! 

पैसा ! पैसा म्हणजे आहे तरी काय ? जगण्यासाठी लागणारी एका अत्यंत गरजेची गोष्ट. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या प्रमुख तीन गरजा आहे. पण यासाठी प्रामुख्याने पैसा लागतो. पैसा मिळविण्यासाठी कष्ट करावे लागतात. कोणाला तो पिढीजात वारसातूनही मिळतो. आपल्याला जो आणि जेवढा पैसा मिळतो तो योग्य तऱ्हेने कसा वापरावा याचं एका गणित असावं. म्हणजे असायला पाहिजे ते सगळ्यांनाच सोडवता येईल असे नाही. पण जर ते प्रत्येकाला सोडविता आलं तर सगळेच सुखी होतील. अर्थात सुख सुद्धा मानण्यावरच असतं म्हणा. 

"आपलं अंथरुण पाहून पाय पसरावे" माझा भाऊ म्हणायचा " अंथरुण सुरवातीलाच मोठं आणलं तर ?" माझी आई म्हणायची " अवश्य, स्वतःच्या सामर्थ्यावर प्रामाणिकपणे आणावं. त्यावर दुसऱ्याला सुद्धा जागा देणं शक्य असेल तर द्यावी." तसं तर नेहमीच माझी आई म्हणायची "सायकलवर असणाऱ्याने मोटारीत बसणाऱ्याकडे पाहून नये, पायी चालणाऱ्या माणसाकडे पहावे आणि आहे त्यात समाधान मानावं." पण माणूस अल्पसंतुष्ट कधीच नसतो. त्याला खूप काही हवं असतं. पण भरपूर पैसा मिळण्यात  थोडा फार नशिबाचाही भाग असतो.

तसं म्हटलं तर पैसाच काही सर्वस्व नसतो. पण त्याच्यावाचून अडतं ही मात्र सुर्प्रकाशाइतकी स्वच्छ आणि स्पष्ट गोष्ट आहे. पैसा मिळवावा, खूप पैसा मिळवावा. मात्र तो मिळविण्याचा मार्ग फक्त सत्य आणि प्रामाणिकपणाचा असावा. 

कुठे ते आठवत नाही पण मी वाचले आहे. संगणकावर सतत एकसारखं खूप काम करण्याऱ्या बाबांना त्यांची पाच वर्षाची मुलगी म्हणते " बाबा, तुम्हाला संगणकावर एक तास काम करायचे किती पैसे मिळतात ? तेव्हढे या माझ्या मनी बँकमधून घ्या. मला तुमचा एक तास हवा आहे. मला तुमच्याशी बोलायचे आहे. तुमच्या बरोबर खेळायचे आहे. " यावरून मला असे सुचले उद्या बायकोही म्हणेल "अहो, नका जाऊ या रविवारी ओव्हरटाईम करायला आपण मुलांना घेऊन कुठे तरी बाहेर फिरायला जाऊ या."  आणि आई-बाबा तर खात्रीने म्हणतीलच, " बाळा, किती तरी काम करतोस ? नको इतके कष्ट करु, जरा खातपित जा, झोप घे, आराम कर, थोडा मोकळ्या हवेत फिरुन ये, मोकळा श्वास घे. राजा, नको हवे आहेत इतके जास्त पैसे, खरच आम्हाला फक्त तूच हवा आहे." 

तर असा हा पैसा ! नात्यापासून दूर नेणारा, भावनांशी खेळणारा, माणसाला एकटं पाडणारा, अजून हवा असं वाटणारा, हाव निर्माण करणारा, नको इतकं थकविणारा पैसा... 

पण तेवढाच आवश्यक असलेला, कुटुंबाची काळजी घेण्यासाठी गरज असणारा, नाती जवळ आणणारा, भावना जपणारा, घरातल्या लहान - मोठ्या माणसांशी  सुसंवाद साधण्यासाठी खूप सारी मदत करणारा, माणसं जोडणारा. तोही पैसाच ! 

विद्यार्थी मित्रांनी, चांगली नोकरी मिळविण्यासाठी शिक्षण ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आईबाबांना वाटत असेल आपला मुलगा चांगला डॉक्टर, उत्तम इंजिनियर, मोठ्ठा ऑफिसर किंवा कुशल व्यावसायिक व्हावा आणि खूप पैसे मिळवून तो सुखात राहावा. त्याच्या अपेक्षा बरोबरही आहेत. शिक्षण घेतांना आपल्याला कशात रस आहे, आपण कशात प्रगती करु शकतो, आपण कोणतं काम चोख करु शकतो याचाही विचार करा. तुम्हाला कुठल्या क्षेत्रात काम करायला आवडेल याचा अंदाज घ्या. तुमचा कला कुठे आहे ? हे अजमावण्यासाठी आशा फौंडेशनसारख्या संस्था कार्यरत आहेत. I AM Test सारख्या परीक्षा द्या. (Intelligence And Aptitude Measurement )

संस्थेतल्या समुपदेशकाकडून समुपदेशन करुन घ्या. एखाद्या व्यवसायाकडे वळा. तो प्रामाणिकपणे करा. अगदी डॉक्टर, इंजिनियर व्हायचे असेल नेमका तिकडेच कल असेल तर त्या क्षेत्रातही जा. शिक्षक, प्राध्यापक व्हा. भरपूर पैसे मिळवा. पण मिळविलेल्या पैशाचा योग्य विनियोग करा. आपल्या कमाईत गोर-गरीब, अपंग, अनाथ यांचाही वाटा असतो याचं भान ठेवा. घरातील लहान थोर मंडळींच्या गरजा पूर्ण करा. माणुसकी आपला धर्म समजा. आयुष्यात सुखाने, मान-सन्मानाने जगा. लक्षात ठेवा, आपण किती जगलो यापेक्षा कसे जगलो याला सर्वात जास्त महत्व आहे. 

पैशाने माणसे जोडली जात असली तरी त्या पैशाच्या दानतीत प्रेम असले पाहिजे. माणुसकी व जिव्हाळा हवा. पैसे फेकून माणसाचे प्रेम विकत घेता येत नाही. मानलेली नातीही काही वेळेला रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ ठरतात. प्रेम आतून असावे लागते नाही तर तुकाराम महाराजांच्या अभंगासारखे व्हायचे- मोले घातले रडाया | नाही असू, नाही माया.

कुठल्यातरी जमातीत म्हणे माणूस मेल्यावर रडायला भाड्याने माणसे आणतात. त्यांच्या मनात प्रेम. माया तर नसतेच पण डोळ्यात खोटे अश्रूसुद्धा नसतात. रडण्याचा आवाज मात्र मोठमोठ्याने गळे काढत हळू हळू वाढतच जातो. 

पैशाने माणूस विकत घेता येईलही, तो तुमच्याकडे तुम्ही मोजलेल्या पैशात राबेलसुद्धा. पण त्यात प्रेम, माया, आपुलकी असणार नाही. तो तुम्ही जे आणि जसं सांगाल, तसंच वागेल. तुमचा फायदा तोटा या दोन्ही गोष्टीशी त्याचं काहीही घेणं देणं नसेल. 

या उलट आपण कधीतरी केव्हातरी कोणाला तरी केलेली एवढीशी मदत तो माणूस कायम लक्षात ठेवतो आणि सहजच चारचौघात बोलून दाखवतो तेव्हा आपल्यालाच कसे तरी होते व त्या माणसाविषयी एकदम आदर वाटू लागतो. खरं म्हणजे ही गोष्ट आपल्या स्मरणातून कधीच निघून गेलेली असते. कारण मदत खूप छोटी असते. 

आमच्या आधीची पिढी म्हणायची, "संसारात थोडी काटकसर करावी. अडचणी सहन कराव्या पण दोन पैसे बाळगून असावे. अगदीच पैशाची निकड असली तर आपण ते पैसे वापरु शकतो. दुसऱ्याजवळ मागायची वेळ येत नाही." त्याचं हे सांगणं आमच्यापुरतंच मर्यादीत नव्हतं. तर प्रत्येक पिढीनेच अगदी लक्षात ठेवून आचरणात आणावं इतकं महत्वाचं आहे. 

आपल्या भारतीय संस्कृतीत पैशाला देव मानतात. पैशाचे लक्ष्मी म्हणून पूजन करतात. आजही कित्येक घरात घरातला कर्ता पुरुष आपल्या महिन्याचा पगार देवाजवळ ठेवतो. घरातील गृहिणी "पैशाला बरकत दे " अशी देवाला प्रार्थना करते आणि मगच पैसे घर खर्चासाठी वापरले जातात आणि म्हणूनच दीपावलीला मोठ्या सन्मानाने लक्ष्मीपूजन केले जाते. 

पैसा खूप मिळवावा म्हणजे रात्रीचा दिवस करुन मिळवावा, खूप कष्ट करावे. स्वतःच्या प्रकृतीची हेळसांड करावी, तहान भूक विसरुन जावी. घराकडे, कुटुंबाकडे दुर्लक्ष करावे. घरातल्या वडिलधाऱ्यांची आबाळ करावी असे मुळीच नाही. कारण पैसा म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मी चंचल असते. म्हणून फक्त पैशाच्या मागे लागू नये. लक्षात ठेवावे आपण पैशासाठी नाही तर पैसा आपल्यासाठी आहे. पैशाचा इतकाही हव्यास करु नये कि, त्याचा उपयोग घेण्यासाठी आपल्याजवळ वेळ तर नसेलच पण तेवढा तकवाही नसेल. पॆसा आपले आईबाबा, बायको, भाऊ, बहीण, मुलंबाळं, नातेवाईक यांच्या आनंदासाठी योग्यवेळी खर्च करा. त्यांच्या सहवासात तुम्ही स्वतःही आनंद घ्या. आर्थिक मदत करा. थोरांबाबत सेवावृत्ती ठेवा. 

पुढे संसारातील जबाबदाऱ्या, संपल्यामुळे आपल्याजवळ भरपूर वेळ असला तरी केवळ पैशाच्या मागे लागल्यामुळे आपण संसारातले आनंदाचे क्षण तर गमावलेच आहेत. पण नको इतके कष्ट करुन आपण आपल्या प्रकृतीचीही वाट लावली आहे. मग कसा घेणार मिळविलेल्या पैशाचा उपभोग ? तर असे व्हायला नको. पैसा जरुर कमवा. मुलाबाळांना शिकवा, खूप मोठं करा, त्यांना भरभरुन प्रेम द्या. भावाबहिणीचं  प्रेम जपा. आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या. त्यांच्याशी सुसंवाद साधा. विचारपूस करा. त्यांच्याशी कृतज्ञ राहा. वडीलधाऱ्या मंडळींच्या भावनांचा आदर करा. बायको पोरांची योग्य ती हौस पुरवा. सगळ्यांसोबत आनंदाचे जीवन जगा. म्हातारपणी त्या आठवणी तुम्हाला तुमच्या आयुष्याची मोठीच कमाई  वाटेल. त्या आठवणींचा आनंद घेत तुम्ही तुमचं व्याधी असलेले म्हातारपण सुद्धा सुसह्य कराल आणि दुर्दैवाने आयुष्याच्या संध्येला जर तुम्ही एकटे म्हणजे जोडीदाराशिवाय असाल तर त्या आनंददायी आठवणी तुमच्यासाठी अमूल्य ठेवा असतील. क्लेशकारक आठवणीही असतील. पण सकारात्मक विचार करुन त्याही कधी मधी आठवा. गंमत तर वाटेलाच पण मजाही येईल. मग तुमच्याजवळ पैसा असला काय किंवा नसला काय. कुठल्याही परिस्थितीत तुम्ही आयुष्याची संध्याकाळ  यशस्वी कराल. सुंदर कराल. 

वारसाहक्कातून किंवा लॉटरी लागून मिळालेल्या गडगंज पैशामुळे तुम्ही श्रीमंत व्हाल, त्याचाही वापर तुम्ही योग्य तऱ्हेने करु शकता. पण कष्टाने, प्रामाणिकपणाने, घाम गाळून, मिळविलेल्या गडगंज पैशामुळे माणूस भला माणूस होतो. खरं म्हणजे आयुष्यात खाल्लेले टक्के टोणपे तसेच आलेल्या बऱ्या वाईट प्रसंगामुळे प्रत्येक वेळी माणूस नव्याने घडतो. 

सुनंदा वि. कुळकर्णी 
७५१७२८१६३९ 
अभिनीत जून २०१५ 

Thursday 4 June 2020

मनात आलं लिहिलं : आनंद

मागील लेखावरून पुढे...

समाज एखाद्या कंपनीत कर्मचाऱ्यांच्या ४० जागा भरायच्या आहेत. त्या जागेसाठी १००० पात्र तरुण उमेदवार मुलाखतीसाठी आले आहेत. ठरल्याप्रमाणे ४० तरुणांची नियुक्ती झाली म्हणून उरलेल्या ९६० उमेदवारांचा हक्क, आनंद ह्या ४० उमेदवारांनी हिसकावून घेतला, असे होत नाही. ती त्यांची हुशारी, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व होतं. तसंचते त्यांचं नशीबही होतच. नोकरी मिळाल्याचा आनंद स्वच्छ, निखळच असतो.

आपल्याला झालेला आनंद आपण केव्हाही एकदा आपल्या जवळच्या माणसाला सांगतो आणि त्याला आपल्या आनंदात सहभागी करून घेतो असे आपल्याला होऊन जाते. स्वतःच्या बाबतीत घडलेली चांगली गोष्ट अन त्यामुळे आपल्याला झालेला आनंद दुसऱ्याला सांगण्यात कुणाला कमीपणा वाटत असेल असे मला तरी वाटत नाही.

पावसाळा दरवर्षी येतो पण उन्हाने अतिशय तापलेली जमीन पहिल्या पावसाच्या शिडकाव्याने ओली होते आणि मातीला जो सुगंध येतो तो मृदगंध नाकाने हृदयात भरभरून साठवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ, त्यापेक्षा उन्हही पडलेलं असते पाऊसही पडत असतो त्यावेळी खूप गंमत वाटते. आकाशातील इंद्रधनुष्य मन प्रसन्न करुन टाकते. तसेच श्रावणातले प्राणी, माणूस, देवदेवतांचे स्मरण करुन देणारे सांवरही मनाला खूप आनंद देतात. गौरी, गणपती, दसरा, दिवाळी इत्यादी सणाचे महत्व जाणून सगळ्यांनी मिळून साजरे केलेले आनंददायी उत्सव तसेच दिवाळीसारख्या सणांत भाऊ-बहीण, बाप-मुलगी, नवरा-बायको, आई-वडील, मुलेबाळे ह्यांच्यासोबत फराळ, फटाके, हास्य-विनोद आणि प्रेमाची देवघेव करत एकमेकांसोबत लुटलेला निर्भेळ आनंद प्रत्येकाने अनुभवला आहेच. प्रत्येक सण एक वेगळा साज आणि अंगाला आनंद घेऊन येतो.
तसं पाहिलं तर हे दरवर्षी नियमितपणे येणारे सण पण ते आपल्याला तितकाच किंबहुना थोडा जास्तच आनंद देतात.
एखाद्या वर्षी हे सण आपण उत्साहाने तसेच आनंदाने साजरे करु शकत नाही. केवळ उपचार म्हणून साजरे करतांना मनात वेदना असते. देवाघरी गेलेल्या माणसाची उणीव आपल्याला सतत भासत असते. कौटुंबिक कलहामुळे सुद्धा आनंद संपूर्णतया उपभोगला जात नाही तर काही वेळेस कुठल्या तरी अपयशाची खंत मनात सलत असते. काळ हे सर्वांवर उत्तम औषध आहे. कालाय तस्मै नमः |
शेवटी आयुष्य आहे. त्यात अशा आनंदाच्या गोष्टी घडतील तसेच क्लेशकारक प्रसंगही येतील. माणूस ते दुःखाचे, अपयशाचे, अपमानाचे प्रसंग मनात ठेवून कुढत राहतो, मनातल्या मानत घुसमटतो. सहसा कुणाजवळ बोलत नाही. अगदी जवळच्या माणसाने काळजीने, प्रेमाने विचारले तर अत्यंत निराशेने सांगतो, पण सांगतानाही हातचं राखतोच तेव्हा आपण त्याला धीर दिला पाहिजे. एवढा काही कठीण प्रसंग नाही अशा गोष्टी तर प्रत्येकाच्याच आयुष्यात घडतात. तू हैतुन नक्कीच बाहेर पडशील असा विश्वास द्यावा. शक्य असलेली मदत मी करीन अशी ग्वाही द्यावी. आपल्या आधाराचा हात त्याच्या पाठीवर ठेवावा. शब्दांपेक्षाही स्पर्श काही वेळेला फार चांगले काम करुन जातो.

आपल्या बोलण्यातून कदाचित तो सावरेलसुद्धा. त्याला आपलं बोलणं पटेलही. समाधानाने आपल्या काळजीतून तो थोडाफार बाहेर पडेल. पुन्हा आपल्या कमला लागेल. माणसात मिसळू लागेल, बोलू लागेल, थोडंफार हसूही लागेल. तो सावरतो आहे हे पाहून आपल्याला जो काही आनंद होईल  तो वेगळाच. म्हणजे आपल्याला शब्दात सुद्धा सांगता येणार नाही असा असेल. आपण दुसऱ्याला दिलेला आनंद मोठा कि दुसऱ्याने आपल्याला दिलेला आनंद मोठा ह्याची आपण तुलनाच नको करु या. मात्र आपण दिलेल्या आनंदाला एक सोनेरी किनार असते. कारण ज्ञान जसे दिल्याने वाढते तसाच आनंदही दिल्याने वाढतो.

आनंदाचे सुद्धा छोटे. मोठे खूप प्रकार असतात. ते आपल्या सगळ्यांच्या वाट्याला येवोत. आपण ठरवलं तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा आपल्याला खूप आनंद घेता येईल. मात्र तो आनंद घेण्याची इच्छा असली पाहिजे.

आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीत आनंद पहा. दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हा. आपल्याही आनंदात त्यांना सामील करुन घ्या. पण जास्त करुन दुसऱ्याच्या आनंदाचं कारण बना. आपल्यामुळे दुसऱ्याला आनंद होतो हि कल्पनाच फार सुखद आहे. तसंच दुसऱ्याच्या दुःखातसहभागी व्हा. त्यांचं दुःख कमी होण्यासाठी, सुसह्य होण्यासाठी त्यांचं सांत्वन करा. मात्र काही झालं तरीही दुसऱ्याच्या दुःखाचं कारण होऊ नका.

बघा, दुसऱ्याला आनंद द्या आणि जेवढा आनंद द्याल त्याच्या दुप्पट आनंद स्वतः मिळवा. आनंद द्यावा, आनंद घ्यावा, आनंद जीवनाचा विसावा.

श्री संत तुकाराम महाराजांच्या "आनंदाचे डोही आनंद तरंग.." ह्या अभंगाने केलेल्या लेखाच्या सुरवातीचा शेवट बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे ह्यांच्या 'आनंदी आनंद गडे...' ह्या कवितेच्या पहिल्या दोन कडव्यांनी करावा असे मला मनापासून वाटते.

निसर्गावर मनापासून प्रेम करणारे 'बालकवी' म्हणतात, बघा आनंद कसा सगळीकडे भरला आहे.

आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे || धृ.||

वरती खाली मोद भरे, 
वायूसंगे मोद फिरे 
नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला 
मोद विहरतो चोहिकडे, आनंदी आनंद गडे || १ ||

सूर्यकिरण सोनेरी हे, 
कौमुदि ही हसते आहे 
खुलली संध्या प्रेमाने, 
आनंदे गाते गाणे 
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले 
इकडे, तिकडे, चोहिकडे, आनंदी आनंद गडे  || २ ||

श्रीमती सुनंदा वि. कुळकर्णी
७५१७२८१६३९
अभिनीत - ऑगस्ट २०१५ 

Thursday 28 May 2020

मनात आलं लिहिलं : आनंद


आनंदाचे डोही | आनंद तरंग
आनंदाची अंग | आनंदाचे || धृ ||
काय सांगो झाले | काहीचिया बाही
पुढे चाली नाही आवडीने || १ ||
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथील जिव्हाळा तेथे बिंबे || २ ||
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा
अनुभव सरिसा मुखी आला || ३ ||

तुकाराम महाराजांचा हा अभंग जेव्हा आपण लतादीदींच्या मधुर आवाजात रेडिओ किंवा दूरदर्शनवर ऐकतो तेव्हा आपणसुद्धा आनंद-विभोर होऊन जातो.

ह्या अभंगात आनंद अगदी ठासून भरला आहे. कुठे अगदी मुंगी जायला सुद्धा जागा नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, "विठ्ठला, असं काही तरी झालं आहे; सांगताही येत नाही अन समजतही नाही. खूप आनंद झाला आहे. ह्यापेक्षा दुसरा मोठा आनंद असूच शकत नाही. आईच्या गर्भात राहायला मिळाले ह्याचा की, मिळणाऱ्या मातृत्वामुळे लाभणाऱ्या आईपणाचा. काय झाले तेच कळत नाही. विठूमाऊली तू मला तुझ्यात सामावून घेतले. मी तुझा झालो अन मी जे अनुभवले तेच माझ्या मुखातून बाहेर आले." विठ्ठल भक्तीतून मिळणारी अनुभूति हा संत तुकारामांचा आनंद आहे. 

ह्या अभंगाचा अर्थ मी माझ्या अल्पमतीनुसार लावला आहे. संत तुकोबांना तो तास अभिप्रेत असेल किंवा नसेलसुद्धा. अध्यात्मिक दृष्टिकोनातून त्यांना वेगळेच काही म्हणावयाचे असेल. तरी त्यांना हा आनंद विठ्ठलाच्या अगदी जवळ गेल्यामुळे प्राप्त झाला आहे. एवढे मात्र खरे.

आपण काही तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, जनाई, मुक्ताईसारख्या साधुसंतांची उंची गाठू शकत नाही. त्यांचा आनंद भगवद प्राप्तीचा आहे. तरी पण आपण आनंदातला आनंद नक्कीच समजू शकतो; कारण आनंद - आनंदच असतो.

आपण सामान्य लोक. आपले आनंद वेगळे - वेगळे म्हणजे प्रपंचातले. परीक्षेत मिळालेलं यश-मिळालेलं घवघवीत यश. उत्तम नोकरी, मानमरातब, पैसा, अनुरूप मिळालेला नवरा, मनासारखी मिळालेली बायको, मुलं होणं, त्यांना मोठं करण्याचा आनंद, त्याला संस्कारक्षम करणं, शिक्षण देणं, त्याची नोकरी, ज्याला आपण आपल्या गरजा कमी करून प्रसंगी पोटाला चिमटा देऊन, आपल्या सर्व हौशी बाजूला सारून मोठं करतो अन जेव्हा आपण आपलं अपत्य सर्वार्थानी सक्षम आणि सुसंस्कारित झालेलं पाहतो;  तेव्हाचा आपला आनंद सुद्धा खूप मोठ्ठा असतो. तो आनंद आपल्या तारुण्यातल्या फलश्रुतीचा असतो. ज्याला आपण मोठं केलं, वाढवलं त्यांनी मनापासून आपल्या उतारवयात बायको-पोरांसकट आपल्यावर प्रेम करणं, आपली काळजी घेणं, आपल्याला हवं, नको बघणं, आपण त्यांना हवे असणं, हे सर्व त्यांच्या वागण्या-बोलण्यातून आपल्या अनुभवाला येणं, हा म्हातारपणातला सर्वात मोठ्ठा आनंद असतो. 

आणि मग आपल्या मुलांची मुलं, त्यांची मुलं, पुन्हा तेच चक्र. मुलांना घडवणं, त्याच अपेक्षा. तोच आनंद. तर असे आपले आनंद. आनंद छोटा असो व मोठा असो, श्रीमंत वा गरीब माणसांचा असो, अगदी मुक्या  प्राण्यांचा का असेना, आनंद आनंदच असतो. कोणाला कशात आनंद वाटेल तर कोणाला कशात आनंद वाटेल ! पण आपल्याला वाटणारा आनंद एकदम स्वच्छ व सर्वांना आनंद देणारा असावा. त्याने दुसरा कुणीही दुःखी होऊ नये. दुसऱ्याचं नुकसान होऊन आपला मात्र फायदा व्हावा हे आपल्या आनंदाचं स्वरुप कधीच नसावं. 

सुनंदा विष्णू कुळकर्णी
७५१७२८१६३९ 

Monday 18 May 2020

कविता-काव्य आणि गाणे



कविता हे एक साहित्याचे महत्वाचे अंग आहे. अंतःकरण, अनुभव यातून कवितेचा जन्म होतो. भावुक मन हा कवितेचा गाभा आहे. असं असलं तरी कविता एक उर्मी आहे. कविता हा मनाचा हुंकार आहे. एखादी कविता सहा महिन्यातही पूर्ण होत नाही. काही वेळेस एका दिवसात तीन कविता लिहिल्या जातात. कारण कविता करता येत नाही, ती स्फुरावी लागते. कविता म्हणजे प्रेम, कविता म्हणजे माया, ममता, वात्सल्य, कविता म्हणजे शृंगार, कविता म्हणजे सहृदयता, कविता म्हणजे देशभक्ती, वीरश्री आणि कविता म्हणजे आभाळ फाटलेला आक्रोश - सुद्धा.


आयुष्यात खाललेले टक्के - टोणपे, जीवनात वाट्याला आलेली सुखं दुःखे, काही करुण अनुभव तसेच प्रेमाचे, मायेचे, वात्सल्याचे, माणुसकीचे, मनाला प्रसन्न करणारे आनंददायी क्षण या सर्वांना आलेले मूर्त शब्दरुप म्हणजे कविता. कवितेतून कवीच्या मनाच्या उत्कट भावना प्रकट होतात. कविता वाचून माणूस अंतर्मुख झाला पाहिजे. कवितेचा स्पर्श मोरपिसासारखा मऊ व संवेदनशील असला पाहिजे. 

कविता म्हणावी, कविता गुणगुणावी, कविता गावी सुद्धा, इतकंच काय कविता नुसती शब्दांच्या अर्थांचे वेध घेत समजून उमजून मनापासून वाचली तरीही ती मनाला खूप आनंद देते. कविता म्हणजे स्वच्छ, सुंदर, निर्मळ आनंद मग ते बडबडगीत असो, बालगीत असो, प्रणय गीत असो, देशभक्तीपर गीत, वीरश्री - गीत, अगदी मनात कालवाकालव होऊन दुःखाने डोळ्यातून अश्रू काढणारे शोक गीत का असेना ते आपल्या मनाचा पूर्ण ठाव घेऊन कवींना आपल्याला नेमकं त्या जागी नेऊन सोडते. फक्त ती कविता अर्थपूर्ण असली पाहिजे आणि तिच्या शब्दात मनात घट्ट रुतून बसण्याची ताकद असायला हवी.

कविता सर्वांनाच आवडतात असे नाही पण समाजाला कवितेची आवड असायला हवी. कविता माणसाला मंत्रमुग्ध करते. आपल्याला गाणे आवडते ना ? मला नाही वाटत असा एखादा माणूस असेल ज्याला गाणे आवडत नाही. आणि गाणे म्हणजे तरी काय ? गेय कविता म्हणजेच गाणे. 

आपल्या महाराष्ट्रात कितीतरी मोठं-मोठे तोडीस तोड कवी होऊन गेले. त्यांचे काव्य आजही आपल्याला स्तिमित करते, खूप आनंद देते आणि जगण्याची दिशा दाखवून जगण्याचे बळ देते. तसेच गाण्याला आपले सर्वस्व वाहून टाकणारे खूप सारे पट्टीचे गायक याच महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांच्या गाण्याने आपल्याला खूप आनंद दिला. दुःख विसरायला लावले. आयुष्य जगायला भाग पाडले. हि फार लांबची खूप आधीची नाही तर गेल्या एक दोन शतकातली गोष्ट आहे. त्याही पूर्वी संत तुकाराम कवी ज्ञानेश्वरांसारखे खूप सारे कवी आणि गायक होऊन गेले, आजही आहेत आणि पुढेही होतील. 

गाण्यात एव्हढी ताकद आहेच. पण हे गाणं म्हणजे तरी काय असतं ? सजलेली एक सुंदर कविता - म्हणजे गाणं 

एक प्रतिभावान कवी एखाद्या चांगल्या अशा छोट्या मोठ्या विषयांवर शब्दांचे रंगी बेरंगी हार गुंफून पाडव्याचे इमले चढवून त्याला आगळावेगळा अर्थ देऊन एक छान कविता करतो. कुशल चाल - देयक त्याला योग्य चाल देतो. गुणी संगीतकार आवश्यकतेनुसार वाड्याचा उपयोग करुन योग्य तो समन्वय साधून कवितेला संगीत देतो आणि एक हुशार आणि पट्टीचा गायक शब्दाचा नेमका अर्थ समजून तो संपूर्ण भाव आपल्या गाण्यात जसाच्या तसा उतरवतो आणि त्या कवितेचं अगदी बावनकशी सोन करुन टाकतो. 

आमच्या आधीची किंवा त्याच्याही आधीची पिढी असेल बायका जात्यावर पायली, पायली दळण ओव्या म्हणत दळत असत. तेव्हा म्हणजे ओव्या म्हटल्यामुळे त्यांना दालनाचे श्रम वाटत नव्हते. आपण कल्पनेत सुद्धा एव्हढे दळण काव्याचा कुठलाही प्रकार म्हणून दळू शकणार नाही. काळाची गरज आणि पिढ्यांचा फरक असला तरी गाण्याने श्रम कमी होतात एव्हढे मात्र खरे. माझी आजी म्हणायची "जात्यावर बसल्यावर ओव्या सुचतेच", अशी एक म्हणच आहे. 

आपला भारत देश संस्कृती प्रधान आहे. संगीताचा भोक्ता आहे. म्हणून आपल्या बऱ्याच संस्कारात गाण्याला महत्व आहे. आपण लग्न, मौंज, नामकरण, मंगळागौर, हरतालिका वगैरे सारख्या कार्यक्रमात गण्याला जास्त प्राधान्य देतो. लग्नात मंगलाष्टके, मुहूर्ताची गाणी, विहिणी, मुलीला निरोप, सुनेचे स्वागत, मौंजीत मातृभोजन गीत, बटूला उपदेश, आणि मंगळागौर, हरतालिका, कोजागिरी वा कुठलंही जागरण. जागरण तर काय गाण्यांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. तेव्हा तर कुठलेही गाणे चालते. नाटक, सिनेमा, भावगीते, भक्तिगीते, भजन, कविता, श्लोक, आरत्या, स्तोत्र काहीही. हे केव्हा तर जेव्हा जगारांवेळी आपण अंताक्षरी खेळतो तेव्हा. कारण आपल्याला गाण्याची मजा लुटायची असते. गाण्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा असतो. मग कशाला हवे अन्ताक्षरीचे नियम आणि कायदे ? फक्त गाणे, आणि गाणे. फक्त गंमत, नुसती मजा एकदम धमाल. केव्हा उजाडते तेही नाही कळत. 

अंगाई गीत तान्ह्या बाळाला झोपवताना आई गाणं म्हणते. त्याला सूर, लय, ताल, चाल असेल असे नाही पण ती मायेने, ममतेने, वात्सल्याने बाळाला झोप यावी म्हणून ज्या आर्त स्वरात गाणे म्हणते ते स्वर बाळाला बरोबर झोप आणतात. शब्द तरी कसे ? गाई, गाई बाळ माझं झोपी जाई, काऊ आला, चिऊ आली बाळाला खाऊ देई. भू, भू हात रे, गाई, गाई अन असंच काही बाही. ते तर बाळाला झोप अनंताचा पण घरातल्या इतरांनाही ऐकायला आवडतं. 

समजा आपण एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमात गेलो, वाद्यवृंद चांगला आहे, वादकही गुणी आहेत, गायक प्रसिद्ध आहेच तसंच पट्टीचा आणि समजून उमजून गाणारा आहे. सर्व प्रकारच्या श्रोत्यांसाठी गाणारा आहे. 

अफलातून कवीच्या कविताच त्याने निवडल्या आहेत. तो बालगीत गातो, आपल्याला आपले बालपण आठवते. तो प्रणयगीत गातो, तरुण एकदम फुलारून उठतात आणि ज्येष्ठांनाही आपले तारुण्यातले दिवस आठवतात. तो भावगीत गातो आपण भावविभोर होऊन गाण्यातच गुंततो. तो भक्तीगीत गायला सुरुवात करतो, एखादं भजन म्हणतो तेव्हा आपण भक्ती रसात बुडून जातो. क्षणभर आपण देवळात आले आहोत असेच वाटते. मुलगी सासरी पाठवणी करणारे गीत जर त्याने गायले तर आमच्यासारख्या बाया-बापड्यांचे डोळे आपसूकच भरुन येतात. हि सगळी ताकद गायकाने गायलेल्या गायकीची तर आहेच. वादकांचीही आहेच. पण तेव्हढीच किंवा थोडी जास्त कमाल असते सगळा साज शृंगार करुन सर्वांगाने नटलेल्या कवीला स्फुरलेल्या कवितेची. खरं म्हणजे कवी - कल्पनेची म्हणजे कवीचीच. 


तर अशी असते कवीची किमया आणि त्याची कविता ! मनाचा ठाव घेणारी, खूप आनंद देणारी, एखाद्याला अक्षरशः वेड लावणारी, तिच्या शब्दातच, शब्दात सांगता येणार नाही अशी विलक्षण जादू असते.  महाराष्ट्रातल्या कालच्या, आजच्या आणि उद्याच्याही सर्व प्रतिभावान कवींना आणि त्यांच्या कवितेला श्रीमंत आणि समृद्ध तसंच अजरामर करणाऱ्या गायक आणि वादकांनाही माझं मनापासून त्रिवार वंदन ! 


तसंही कवी आणि गायक  या दोघांचं खूप जवळच नातं आहे. याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कवी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेलं आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध करुन स्वतः गायलेलं गीत रामायण होय. याचा वर्षी श्रीराम नवमीला गीत रामायणाला ६१ वर्षे पूर्ण झाली. ६१ वर्षांनंतरही गीत रामायणातली कथा, कविता, काव्य आणि गायक तेव्हढंच नवीन व ताजं टवटवीत आहे. "काव्य नव्हे हा अमृतसंचय" असे म्हणून सर्व मराठी व अमराठी माणसांनी त्याला मान्यता दिली आणि आपल्या हृदयात पूजेचं स्थान दिलं. आता गदिमाही नाहीत आणि बाबुजीही नाहीत पण त्यांचं गीत रामायण प्रत्येक घराघरात पोहोचलं आहे. दोघांनाही मनापासून आदरांजली. 


सुनंदा विष्णू कुळकर्णी 
७५१७२८१६३९
अभिनीत जुलै - २०१६ 

वेळा

गेलेली वेळ कितीही पैसे मोजले तयारी विकत घेता येत नाही आणि आलेल्या योग्य वेळेचा योग्य तो उपयोग करुन तीच फायदा घ्यायचा असेल तर त्या वेळेसाठी ए...