Thursday 28 May 2020

मनात आलं लिहिलं : आनंद


आनंदाचे डोही | आनंद तरंग
आनंदाची अंग | आनंदाचे || धृ ||
काय सांगो झाले | काहीचिया बाही
पुढे चाली नाही आवडीने || १ ||
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा
तेथील जिव्हाळा तेथे बिंबे || २ ||
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा
अनुभव सरिसा मुखी आला || ३ ||

तुकाराम महाराजांचा हा अभंग जेव्हा आपण लतादीदींच्या मधुर आवाजात रेडिओ किंवा दूरदर्शनवर ऐकतो तेव्हा आपणसुद्धा आनंद-विभोर होऊन जातो.

ह्या अभंगात आनंद अगदी ठासून भरला आहे. कुठे अगदी मुंगी जायला सुद्धा जागा नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, "विठ्ठला, असं काही तरी झालं आहे; सांगताही येत नाही अन समजतही नाही. खूप आनंद झाला आहे. ह्यापेक्षा दुसरा मोठा आनंद असूच शकत नाही. आईच्या गर्भात राहायला मिळाले ह्याचा की, मिळणाऱ्या मातृत्वामुळे लाभणाऱ्या आईपणाचा. काय झाले तेच कळत नाही. विठूमाऊली तू मला तुझ्यात सामावून घेतले. मी तुझा झालो अन मी जे अनुभवले तेच माझ्या मुखातून बाहेर आले." विठ्ठल भक्तीतून मिळणारी अनुभूति हा संत तुकारामांचा आनंद आहे. 

ह्या अभंगाचा अर्थ मी माझ्या अल्पमतीनुसार लावला आहे. संत तुकोबांना तो तास अभिप्रेत असेल किंवा नसेलसुद्धा. अध्यात्मिक दृष्टिकोनातून त्यांना वेगळेच काही म्हणावयाचे असेल. तरी त्यांना हा आनंद विठ्ठलाच्या अगदी जवळ गेल्यामुळे प्राप्त झाला आहे. एवढे मात्र खरे.

आपण काही तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, जनाई, मुक्ताईसारख्या साधुसंतांची उंची गाठू शकत नाही. त्यांचा आनंद भगवद प्राप्तीचा आहे. तरी पण आपण आनंदातला आनंद नक्कीच समजू शकतो; कारण आनंद - आनंदच असतो.

आपण सामान्य लोक. आपले आनंद वेगळे - वेगळे म्हणजे प्रपंचातले. परीक्षेत मिळालेलं यश-मिळालेलं घवघवीत यश. उत्तम नोकरी, मानमरातब, पैसा, अनुरूप मिळालेला नवरा, मनासारखी मिळालेली बायको, मुलं होणं, त्यांना मोठं करण्याचा आनंद, त्याला संस्कारक्षम करणं, शिक्षण देणं, त्याची नोकरी, ज्याला आपण आपल्या गरजा कमी करून प्रसंगी पोटाला चिमटा देऊन, आपल्या सर्व हौशी बाजूला सारून मोठं करतो अन जेव्हा आपण आपलं अपत्य सर्वार्थानी सक्षम आणि सुसंस्कारित झालेलं पाहतो;  तेव्हाचा आपला आनंद सुद्धा खूप मोठ्ठा असतो. तो आनंद आपल्या तारुण्यातल्या फलश्रुतीचा असतो. ज्याला आपण मोठं केलं, वाढवलं त्यांनी मनापासून आपल्या उतारवयात बायको-पोरांसकट आपल्यावर प्रेम करणं, आपली काळजी घेणं, आपल्याला हवं, नको बघणं, आपण त्यांना हवे असणं, हे सर्व त्यांच्या वागण्या-बोलण्यातून आपल्या अनुभवाला येणं, हा म्हातारपणातला सर्वात मोठ्ठा आनंद असतो. 

आणि मग आपल्या मुलांची मुलं, त्यांची मुलं, पुन्हा तेच चक्र. मुलांना घडवणं, त्याच अपेक्षा. तोच आनंद. तर असे आपले आनंद. आनंद छोटा असो व मोठा असो, श्रीमंत वा गरीब माणसांचा असो, अगदी मुक्या  प्राण्यांचा का असेना, आनंद आनंदच असतो. कोणाला कशात आनंद वाटेल तर कोणाला कशात आनंद वाटेल ! पण आपल्याला वाटणारा आनंद एकदम स्वच्छ व सर्वांना आनंद देणारा असावा. त्याने दुसरा कुणीही दुःखी होऊ नये. दुसऱ्याचं नुकसान होऊन आपला मात्र फायदा व्हावा हे आपल्या आनंदाचं स्वरुप कधीच नसावं. 

सुनंदा विष्णू कुळकर्णी
७५१७२८१६३९ 

Monday 18 May 2020

कविता-काव्य आणि गाणे



कविता हे एक साहित्याचे महत्वाचे अंग आहे. अंतःकरण, अनुभव यातून कवितेचा जन्म होतो. भावुक मन हा कवितेचा गाभा आहे. असं असलं तरी कविता एक उर्मी आहे. कविता हा मनाचा हुंकार आहे. एखादी कविता सहा महिन्यातही पूर्ण होत नाही. काही वेळेस एका दिवसात तीन कविता लिहिल्या जातात. कारण कविता करता येत नाही, ती स्फुरावी लागते. कविता म्हणजे प्रेम, कविता म्हणजे माया, ममता, वात्सल्य, कविता म्हणजे शृंगार, कविता म्हणजे सहृदयता, कविता म्हणजे देशभक्ती, वीरश्री आणि कविता म्हणजे आभाळ फाटलेला आक्रोश - सुद्धा.


आयुष्यात खाललेले टक्के - टोणपे, जीवनात वाट्याला आलेली सुखं दुःखे, काही करुण अनुभव तसेच प्रेमाचे, मायेचे, वात्सल्याचे, माणुसकीचे, मनाला प्रसन्न करणारे आनंददायी क्षण या सर्वांना आलेले मूर्त शब्दरुप म्हणजे कविता. कवितेतून कवीच्या मनाच्या उत्कट भावना प्रकट होतात. कविता वाचून माणूस अंतर्मुख झाला पाहिजे. कवितेचा स्पर्श मोरपिसासारखा मऊ व संवेदनशील असला पाहिजे. 

कविता म्हणावी, कविता गुणगुणावी, कविता गावी सुद्धा, इतकंच काय कविता नुसती शब्दांच्या अर्थांचे वेध घेत समजून उमजून मनापासून वाचली तरीही ती मनाला खूप आनंद देते. कविता म्हणजे स्वच्छ, सुंदर, निर्मळ आनंद मग ते बडबडगीत असो, बालगीत असो, प्रणय गीत असो, देशभक्तीपर गीत, वीरश्री - गीत, अगदी मनात कालवाकालव होऊन दुःखाने डोळ्यातून अश्रू काढणारे शोक गीत का असेना ते आपल्या मनाचा पूर्ण ठाव घेऊन कवींना आपल्याला नेमकं त्या जागी नेऊन सोडते. फक्त ती कविता अर्थपूर्ण असली पाहिजे आणि तिच्या शब्दात मनात घट्ट रुतून बसण्याची ताकद असायला हवी.

कविता सर्वांनाच आवडतात असे नाही पण समाजाला कवितेची आवड असायला हवी. कविता माणसाला मंत्रमुग्ध करते. आपल्याला गाणे आवडते ना ? मला नाही वाटत असा एखादा माणूस असेल ज्याला गाणे आवडत नाही. आणि गाणे म्हणजे तरी काय ? गेय कविता म्हणजेच गाणे. 

आपल्या महाराष्ट्रात कितीतरी मोठं-मोठे तोडीस तोड कवी होऊन गेले. त्यांचे काव्य आजही आपल्याला स्तिमित करते, खूप आनंद देते आणि जगण्याची दिशा दाखवून जगण्याचे बळ देते. तसेच गाण्याला आपले सर्वस्व वाहून टाकणारे खूप सारे पट्टीचे गायक याच महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांच्या गाण्याने आपल्याला खूप आनंद दिला. दुःख विसरायला लावले. आयुष्य जगायला भाग पाडले. हि फार लांबची खूप आधीची नाही तर गेल्या एक दोन शतकातली गोष्ट आहे. त्याही पूर्वी संत तुकाराम कवी ज्ञानेश्वरांसारखे खूप सारे कवी आणि गायक होऊन गेले, आजही आहेत आणि पुढेही होतील. 

गाण्यात एव्हढी ताकद आहेच. पण हे गाणं म्हणजे तरी काय असतं ? सजलेली एक सुंदर कविता - म्हणजे गाणं 

एक प्रतिभावान कवी एखाद्या चांगल्या अशा छोट्या मोठ्या विषयांवर शब्दांचे रंगी बेरंगी हार गुंफून पाडव्याचे इमले चढवून त्याला आगळावेगळा अर्थ देऊन एक छान कविता करतो. कुशल चाल - देयक त्याला योग्य चाल देतो. गुणी संगीतकार आवश्यकतेनुसार वाड्याचा उपयोग करुन योग्य तो समन्वय साधून कवितेला संगीत देतो आणि एक हुशार आणि पट्टीचा गायक शब्दाचा नेमका अर्थ समजून तो संपूर्ण भाव आपल्या गाण्यात जसाच्या तसा उतरवतो आणि त्या कवितेचं अगदी बावनकशी सोन करुन टाकतो. 

आमच्या आधीची किंवा त्याच्याही आधीची पिढी असेल बायका जात्यावर पायली, पायली दळण ओव्या म्हणत दळत असत. तेव्हा म्हणजे ओव्या म्हटल्यामुळे त्यांना दालनाचे श्रम वाटत नव्हते. आपण कल्पनेत सुद्धा एव्हढे दळण काव्याचा कुठलाही प्रकार म्हणून दळू शकणार नाही. काळाची गरज आणि पिढ्यांचा फरक असला तरी गाण्याने श्रम कमी होतात एव्हढे मात्र खरे. माझी आजी म्हणायची "जात्यावर बसल्यावर ओव्या सुचतेच", अशी एक म्हणच आहे. 

आपला भारत देश संस्कृती प्रधान आहे. संगीताचा भोक्ता आहे. म्हणून आपल्या बऱ्याच संस्कारात गाण्याला महत्व आहे. आपण लग्न, मौंज, नामकरण, मंगळागौर, हरतालिका वगैरे सारख्या कार्यक्रमात गण्याला जास्त प्राधान्य देतो. लग्नात मंगलाष्टके, मुहूर्ताची गाणी, विहिणी, मुलीला निरोप, सुनेचे स्वागत, मौंजीत मातृभोजन गीत, बटूला उपदेश, आणि मंगळागौर, हरतालिका, कोजागिरी वा कुठलंही जागरण. जागरण तर काय गाण्यांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. तेव्हा तर कुठलेही गाणे चालते. नाटक, सिनेमा, भावगीते, भक्तिगीते, भजन, कविता, श्लोक, आरत्या, स्तोत्र काहीही. हे केव्हा तर जेव्हा जगारांवेळी आपण अंताक्षरी खेळतो तेव्हा. कारण आपल्याला गाण्याची मजा लुटायची असते. गाण्याचा पुरेपूर आनंद घ्यायचा असतो. मग कशाला हवे अन्ताक्षरीचे नियम आणि कायदे ? फक्त गाणे, आणि गाणे. फक्त गंमत, नुसती मजा एकदम धमाल. केव्हा उजाडते तेही नाही कळत. 

अंगाई गीत तान्ह्या बाळाला झोपवताना आई गाणं म्हणते. त्याला सूर, लय, ताल, चाल असेल असे नाही पण ती मायेने, ममतेने, वात्सल्याने बाळाला झोप यावी म्हणून ज्या आर्त स्वरात गाणे म्हणते ते स्वर बाळाला बरोबर झोप आणतात. शब्द तरी कसे ? गाई, गाई बाळ माझं झोपी जाई, काऊ आला, चिऊ आली बाळाला खाऊ देई. भू, भू हात रे, गाई, गाई अन असंच काही बाही. ते तर बाळाला झोप अनंताचा पण घरातल्या इतरांनाही ऐकायला आवडतं. 

समजा आपण एखाद्या गाण्याच्या कार्यक्रमात गेलो, वाद्यवृंद चांगला आहे, वादकही गुणी आहेत, गायक प्रसिद्ध आहेच तसंच पट्टीचा आणि समजून उमजून गाणारा आहे. सर्व प्रकारच्या श्रोत्यांसाठी गाणारा आहे. 

अफलातून कवीच्या कविताच त्याने निवडल्या आहेत. तो बालगीत गातो, आपल्याला आपले बालपण आठवते. तो प्रणयगीत गातो, तरुण एकदम फुलारून उठतात आणि ज्येष्ठांनाही आपले तारुण्यातले दिवस आठवतात. तो भावगीत गातो आपण भावविभोर होऊन गाण्यातच गुंततो. तो भक्तीगीत गायला सुरुवात करतो, एखादं भजन म्हणतो तेव्हा आपण भक्ती रसात बुडून जातो. क्षणभर आपण देवळात आले आहोत असेच वाटते. मुलगी सासरी पाठवणी करणारे गीत जर त्याने गायले तर आमच्यासारख्या बाया-बापड्यांचे डोळे आपसूकच भरुन येतात. हि सगळी ताकद गायकाने गायलेल्या गायकीची तर आहेच. वादकांचीही आहेच. पण तेव्हढीच किंवा थोडी जास्त कमाल असते सगळा साज शृंगार करुन सर्वांगाने नटलेल्या कवीला स्फुरलेल्या कवितेची. खरं म्हणजे कवी - कल्पनेची म्हणजे कवीचीच. 


तर अशी असते कवीची किमया आणि त्याची कविता ! मनाचा ठाव घेणारी, खूप आनंद देणारी, एखाद्याला अक्षरशः वेड लावणारी, तिच्या शब्दातच, शब्दात सांगता येणार नाही अशी विलक्षण जादू असते.  महाराष्ट्रातल्या कालच्या, आजच्या आणि उद्याच्याही सर्व प्रतिभावान कवींना आणि त्यांच्या कवितेला श्रीमंत आणि समृद्ध तसंच अजरामर करणाऱ्या गायक आणि वादकांनाही माझं मनापासून त्रिवार वंदन ! 


तसंही कवी आणि गायक  या दोघांचं खूप जवळच नातं आहे. याच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कवी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेलं आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध करुन स्वतः गायलेलं गीत रामायण होय. याचा वर्षी श्रीराम नवमीला गीत रामायणाला ६१ वर्षे पूर्ण झाली. ६१ वर्षांनंतरही गीत रामायणातली कथा, कविता, काव्य आणि गायक तेव्हढंच नवीन व ताजं टवटवीत आहे. "काव्य नव्हे हा अमृतसंचय" असे म्हणून सर्व मराठी व अमराठी माणसांनी त्याला मान्यता दिली आणि आपल्या हृदयात पूजेचं स्थान दिलं. आता गदिमाही नाहीत आणि बाबुजीही नाहीत पण त्यांचं गीत रामायण प्रत्येक घराघरात पोहोचलं आहे. दोघांनाही मनापासून आदरांजली. 


सुनंदा विष्णू कुळकर्णी 
७५१७२८१६३९
अभिनीत जुलै - २०१६ 

Saturday 16 May 2020

भारतीय संस्कृती आणि संस्कार




संस्कृती म्हणजे सर्वांगाने सारासार विचार करुन निर्माण झालेली श्रेष्ठ जीवन पद्धती ! यातला महत्वाचा विचार म्हणजे सर्वांचे कल्याण, सर्वांचे सुख व आपल्याही जीवनाचे सार्थक व्हावे. माणसाच्या "सांस्कृतिक जीवन" हा त्याचा मौल्यवान ठेवा आहे. तो आधीच्या पिढीने पुढच्या पिढीमध्ये स्वतःच्या आचरणातून अगदी सहजपणे अलगद सोपवावा. पुढच्या पिढीने त्यात मोलाची भर घालून तो पुढे पुढे न्यावा आणि हे असे पिढ्यानपिढ्या चालावे. 

अजूनही सर्व देशांत भारताचा आदर केला जातो. म्हणूनच स्वामी विवेकानंदानी शिकागोच्या 'सर्व धर्म  परिषदेत', "माझ्या अमेरिकन बंधू भगिनींनो..." अशी जेव्हा आपल्या भाषणाला सुरवात केली तेव्हा पुढचे काहीही न ऐकता अमेरिकेत उत्स्फूर्त टाळ्यांचा कडकडाट झाला. विवेकानंदानी अर्धी सभा तेव्हाच जिंकली. हे कशामुळे ? भारतातील 'सर्व धर्म समभाव' ह्या संस्कृतीमुळे. माणुसकी हा माणसाचा पहिला धर्म आहे. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. साने गुरुजी म्हणतात - खरा तो एकची धर्म , जगाला प्रेम अर्पावे. 


फार पूर्वी म्हणजे मी खूप लहान असतांना लोकसत्तेत चं. प. भिशीकर यांचे एक सदर (नाव आठवत नाही) यायचे. त्यातील हि खरी गोष्ट आहे. लोक एस. टी. बसचा प्रवास करीत होते. गप्पा चालल्या होत्या. भारत देश असाच आहे, अप्रगत आहे, अशिक्षित आहे, रस्ते चांगले नाही वगैरे वगैरे... असं एक इंग्रजी माणूस म्हणत होता. सगळे हो शी हो लावत होते. एका गावाला बस थांबली. त्यावर्षी पाण्याचा दुष्काळ होता. पाणीवाल्या १०/१२ वर्षाच्या मुलाकडून त्या इंग्रजाने पाणी घेतले, चार आणे झाले साहेब. त्याने त्याला आठ आणे दिले. म्हणाला ठेव तुझ्याकडे, त्याच हातावर त्यामुलाने चार आणे ठेवले आणि म्हणाला, "साहेब, पाणी खूप दुरुन डोक्यावर कळशी ठेवून आणावे लागते. खूप मान दुखते.  त्याचे म्हणजे कष्टाचे पैसे घेतो मी. पाण्याचे नाही." बस सुटली तो इंग्रज हातातल्या चार आण्यांकडे पाहताच राहिला. सगळे अवाक झाले. एक भारतीय म्हणाला, " साहेब, असा आहे माझा देश". तर हि आहे भारताची संस्कृती. देण्याची, प्रामाणिकपणाची, कष्टाची.




स्वराज्याची मुहूर्तमेढ छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. दादोजी कोंडदेव यांनी दिलेल्या शिक्षणामुळे, जिजाऊंच्या संस्कारामुळे आणि सामान्य पण एकनिष्ठ देशप्रेमाने प्रेरित झालेले मावळे याच्या आधारावर त्यांनी स्वराज्यासाठी लढा दिला. त्याकाळी मुस्लिम लोकांनी हिंदूंच्या घरादारावर नांगर फिरविला. कितीतरी हिंदू स्त्रियांवर अत्याचार केले. सगळं भ्रष्टाचार माजवला. अशात कल्याणच्या सुभेदाराची सून पकडली गेली. वचपा, सुड म्हणून अतिशय स्वरुपवान असलेल्या सुभेदाराच्या सुनेला छ. शिवाजी महाराजांसमोर आणले गेले. महाराज रागावले, म्हणाले हे बरोबर नाही, त्यांनी तिला साडी चोळी देऊन व ओटी भरून सन्मानाने तिच्या घरी परत पाठविले. तिच्याकडे प्रेमाने, मायेने, आपुलकीने पाहत ते म्हणाले - जे दशरथ पुजारी यांनी गायलेल्या एका सुंदर गाण्यात आहे. 


अशीच आमुची आई असती सुंदर रुपवती |
आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती ||

तर अशी आहे आपली भारतीय संस्कृती. परस्रीला माय-बहीण मानणारी, तिचा सन्मान करणारी.  आचार्य स. ज. भागवत म्हणतात - 
वात्सल्याने भरलेली, जीवावर प्रेम करणारी, जे जे उत्पन्न होईल ते ते वाढावे अशी जिची कल्पना आहे टी माता जीवनाची मूर्ती आहे. संस्कृती निर्माण करायची असेल तर ती मातारुपी स्त्रीच करु शकेल. आणि अशा लाखो करोडो माता माझ्या भारत देशात आहेत म्हणूनच भारतीय संस्कृतीला तोड नाही. 

आता थोडे संस्काराविषयी...



सुशिक्षित माणूस सुसंस्कृत असेलच असे नाही. पण संकारक्षम माणूस सुसंस्कृत असतोच. मग तो गरीब वा श्रीमंत असो, मोठा वा लहान असेल, शहरी वा ग्रामीण भागातील असेल किंवा शिकलेला वा अशिक्षित  असेल. संस्कार माणसावर ज्याचे त्याचे वेगळे असले तरी प्रामुख्याने संस्कार घरातूनच होतात. शाळा हे संस्काराचे दुसरे प्रांगण आहे. शाळेतल्या शिक्षकांची छाप विद्यार्थ्यांवर फार लवकर पडते. आणि म्हणूनच अभ्यासाबरोबर संस्कार करण्याची शिक्षकाची जबाबदारी हि वाढते. तसेच आई-बाबा, आजी-आजोबा, आत्या-मामा, काका-काकू यांच्या स्वभावाचा आणि वागण्याचा मुलांवर फार मोठा परिणाम होतो. आई-वडील त्यांचे दैवत असतात. मुले जशीजशी मोठी होतात, तसं त्यांच्या समोर बऱ्याच गोष्टी येतात. पण त्यातले काय चांगले ? काय वाईट ? हे त्यांना कळत नाही. पण ते समजावण्याची बुद्धी त्यांना घरातील माणसांकडूनच मुख्यतः आई-वडिलांकडून मिळते. हे असं कर, ते तसं कर हे असं त्याला फार्स सांगावं लागत नाही. आई-वडिलांच्या आणि घरातल्या सर्वच माणसांच्या वागण्या-बोलण्यातून त्यांच्यावर संस्कार होत असतात. 'एकत्र कुटुंब पद्धती' हा मुले उत्तम घडविण्याचा योग्य मार्ग आहे. प्रत्येकाच्या वेगळ्या स्वभावामुळे त्यांच्यात कुरबुर असेलही, मतभेदही होतील, पण स्वतःच्या सहवासाने ते एकमेकांना इतके जोडले जातात कि त्यांच्यामधील प्रेम मात्र एकदम निखळ असते, स्वच्छ असते. आता पुढच्या पिढीत 'हम दो हमारे दो किंवा एकच' अशा जमान्यात घरात आजी-आजोबांशिवाय दुसरी माणसं कुठून आणणार ? असो. 


संस्कार मुलांवर कोवळ्या वयापासूनच व्हायला हवेत. घरात लहान मुले असली कि मोठ्या माणसांची जबाबदारी जास्त वाढते. मुले अनुकरणप्रिय असतात. जशी मोठी माणसे वागतात, तशीच ती वागतात. म्हणजे त्यांना वाटते कि असेच वागायचे असते. म्हणून घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींशी नम्रता राखली पाहिजे. लहानशी प्रेमाने वागले पाहिजे. सर्वांनी एकमेकांना समजून घेतले पाहिजे. काही मतभेद झालेच तर त्याची झळ मुलांना लागत कामा नये. 

पालकांनो, मुलांना मोठं करा. त्यांना शिकवा, त्यांना जे व्हायचे असेल ते होऊ द्या. डॉक्टर , इंजिनियर होण्याचं दडपण त्यांच्यावर आणू नका. मात्र त्यांच्यावर चांगले संस्कार करा. शक्ये तो ते आपल्या वागण्यातून करा. आपल्या वागण्या-बोलण्यातूनच झालेले संस्कार मुलांच्या मनात घर करुन राहतात आणि संस्कार कधीही बेईमान होत नाहीत, चुकूनही दगाफटका करीत नाही. ते ज्यांना मिळतात त्यांच्यात रुजतात, वाढतात, फोफावतात. ते त्या माणसाला तर मोठं करतातच पण आपल्या समोरच्या माणसालाही मोठं करतात. 

तसही संस्कार आणि संस्कृती यांचं फार जवळच नातं आहे. देशाची संस्कृती त्या देशाच्या संस्कारावरच अवलंबून असते. सुसंस्कारानी संस्कृतीची वीण घट्ट होते. आपण आपलंच मिळवून खाणं हि प्रकृती आहे. म्हणजे हा मनुष्य स्वभाव आहे. दुसऱ्याचे हिसकावून घेणं, ते खाणं हि विकृती आहे. म्हणजे हि खूपच वाईट गोष्ट आहे. पण आपल्या जवळ असलेलं दुसऱ्याला देऊन उरलेलं आपण खाणं हि संस्कृती आहे. म्हणजे अतिशय चांगली गोष्ट आहे. तोही एक चांगला संस्कार आहे. 

परमेश्वरावर विश्वास, रागावर ताबा, क्षमाशील वृत्ती, देण्याचा स्वभाव, दुसऱ्याला समजून घेण्याची बुद्धी, तडजोड करण्याची तयारी, कर्तव्याची जाणीव, ते मनापासून पार पाडण्याची तळमळ, फल-निरपेक्ष-कर्म, दिव्यांग लोकांविषयी सहानुभूती, प्राणिमात्रांवर दया, माणसांमध्ये देव पाहण्याची वृत्ती, कुणाचे मन न दुखावणे, घरी आलेल्या माणसाचे स्वागत करणे, घरात असेल ते प्रेमाने खाऊ घालणे, आहे त्यात समाधान मानणे, मदतीची गरज असलेल्यांना मदत करणे हि माझ्या भारतीय संस्कृतीची प्रमुख सूत्रे आहेत. 

मला वाटतंय हेच खर अध्यात्म असावं ! 

सुनंदा विष्णू कुळकर्णी
७५१७२८१६३९ 
(अभिनीत, सप्टेंबर २०१६)

Thursday 14 May 2020

मनात आलं लिहिलं : देव


तुम्ही देव पहिला आहे का ? नाही न ! मीही नाही पहिला. तरीही आपण तर्क - वितर्क करतच बसतो. देव म्हणजे काय ? देव आहे कि नाही ? असला तर कुठे आहे ? त्याला कोणी पाहिलं आहे का ? नसेल पाहिलं तर त्याला मानायचं कि नाही ? मी आस्तिक आहे म्हणजे माझी देवावर श्रद्धा आहे, विश्वास आहे. मी नास्तिक आहे म्हणजे मी देवच मानत नाही. मग मी त्याच्यावर विश्वास का ठेवावा ? हे सारे प्रश्न निरर्थक आहे असं मला वाटतं. हे प्रश्न आपल्याला पडतातच कां ? हाच मला खरा प्रश्न आहे. देव असेल नसेल माहित नाही. पण या साऱ्या विश्वाचा, आकाश पृथ्वीचा, तसेच निसर्गाचा समतोल सांभाळणारा कुणीतरी असेलच ना ? नक्कीच आहे. तो कोण असावा ?

हवा आपल्याला दिसते कां ? नाही दिसत. पण उन्हाळ्यात झाडाखाली बसल्यावर आलेली थंड हवेची झुळूक, पसल्यातील शितोळा वाहणारी दमट हवा तसेच हिवाळ्यातील अंगावर शहारे आणणारी थंडगार हवा आपल्याला चांगली जाणवते आणि सुखावते सुद्धा. तसंच काहीसं देवाचं असावं.

आपल्यावर एखादं थोडंसं जरी संकट आलं कि, आपण म्हणतो, "देवा काय केलंस हे ? कां केलंस ?" आणि आपण त्यातून सही-सलामत बाहेर पडलो किंवा दुसरं काही चांगलं घडलं तर लगेच म्हणतो, "Thanks God". तर हे असं कां होतं ? त्यामागे नक्कीच हृदयाच्या एका कप्प्यात आपली देवाविषयीची श्रद्धा आहे. वाईट प्रसंगात अनवधानाने कां होईना सगळेच म्हणतात, "देवा, धाव बाप्पा, आता तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. ह्यातून तूच आम्हाला वाचवू शकशील !" हे कशाचं प्रतिक आहे ? देव असल्याचं आपण मान्य केलं किंवा मान्य केलं नाही तरी देवाचं अस्तित्व आपल्या मनात कुठेतरी घर करुन आहे आणि हेच आपल्याला कळत नाही. पण ते सत्य आहे.

जगात पशु-पक्षी, जीव-जंतू, जलचर, विचार, उभयचर, निशाचर असे खूप सारे सजीव प्राणी आहेत. ह्या सर्वात मानवप्राणी असा आहे कि, त्याच्याजवळ बुद्धी आहे. आपल्या बुद्धीचा उपयोग करुन त्याने आपल्या जीवनात खूप सुखसोयी निर्माण केल्या आहेत. कशामुळे ? तर निसर्गाची त्याच्यावर कृपादृष्टी आहे. मानवप्राणी हि निसर्गाची सर्वात उत्तम निर्मिती आहे. मनुष्य बुद्धिमान आहे. त्याच्याजवळ आकलन शक्ती आहे. तो चांगला व वाईट असा सारासार विचार करु शकतो. त्या विचारानुसार तो घडतो.


एका मोटारकार आहे. माणसांनीच बनविलेली आहे. सुसज्ज आहे. वातानुकूलित आहे आणि चांगला वेग देणारी आहे. रंगही मस्त आहे. नुसतं बघत राहावंसं वाटतं पण ती चालवायला चालकच नाही. म्हणून ती एका ठिकाणी उभी आहे. कारण चालकाशिवाय ती चालूच शकत नाही. तसंच अगदी तसंच ह्या एवढ्या मोठ्या जगाचा डोलारा सावरणारा आणि साऱ्या विश्वाचा कारभार सांभाळणारासुद्धा कुणीतरी नक्कीच आहे. मग त्याला तुम्ही देव म्हणा, नियती म्हणा किंवा निसर्ग, विश्वचक्र किंवा एखादी शक्ती म्हणा. काहीही म्हणा, पण हे जग चालविणारा कुणीतरी आहेच. त्यामुळे जगाचं रहाटगाडगं संतुलित आहे. व्यवस्थित चालू आहे. सूर्य-चंद्राचा उदय होणं तसंच त्याचं अस्ताला जाणं, एवढंस बीज रुजवलं कि, त्याला अंकुर फुटून त्याचा मोठा वृक्ष होणं, धान्य, भाजीपाला पिकवणं, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या ऋतूंचा काळ ठरलेला असणं, जन्म-मरणाची वेळ, काळ, स्थळ ठरलेली असून कोणालाच माहिती नसणं, मी ह्याच आईवडिलांच्या पोटी जन्म घेणार आहे असं काहीही आपण ठरवूच शकत नाही. माझं मरण ह्याचवेळी, ह्याच ठिकाणी, अशा प्रकारेच होणार आहे, ह्याची आपल्याला सुतराम कल्पना नसते. ते कुणीतरी दुसऱ्याच शक्तीने आधीच ठरविलेलं असतं आणि तसंच घडतं. आता लोकं म्हणतात, "जन्म हातात आला आहे." पण माझ्या माहितीतील गोष्ट आहे, डॉक्टर म्हणाले, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण सीझर करु. कारण ते करावंच लागणार आहे. आम्ही २ मे हा चांगला दिवस म्हणून ठरवून टाकला. तसे डॉक्टरांना सांगितले. ते "ठीक आहे" म्हणाले. पण पेशंटला ३० एप्रिल रोजीच त्रास व्हायला लागला आणि अत्यंत आवश्यक म्हणून ३० एप्रिललाच बाळाला जन्म द्यावा लागला. तसेच काही अशा कारणांमुळे ठरलेल्या दिवशी सीझर ना होता २ / ४  दिवस बाळाचा जन्म पुढे ढकलला गेला आहे. म्हणजेच जन्म हातात आला आहे कां माणसाच्या ? मरण तर कोणाच्याच हातात नाही. एखाद्या मोठ्या आजारातून जर कोणी वाचलाच तर डॉक्टरांचे प्रयत्न तर आहेतच पण त्याच्या आयुष्याची दोरी बळकट होती असेच लोकं म्हणतात. म्हणजेच जन्म-मृत्यूची दोरे देवाने आपल्याच हातात ठेवली आहे.

जन्म-मरणाच्यामधलं आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य मात्र संपूर्णपणे आपल्या स्वतःचंच असतं ते फार सुंदर आहे. ते आपण पूर्वपुण्याईने चांगलं घालवू शकतो. पण पूर्व-पुण्याई आहे कि नाही हे हि आपल्याला माहित नाही, तरीही आपण आपलं आयुष्य प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर काहीतरी सत्कार्य करुन सदाचाराने वागून दुसऱ्याला आनंद देऊन, जगण्याचं सार्थक करुन सुंदर करु शकतो. एवढं आपण नक्कीच करु शकतो. संत कबीरांचा एका दोहा आहे -

कबीरा, जब हम पैदा हुए, जग हसे हम रोये | 
ऐसी करनी कर चलो, हम हसे जग रोये ||

जेव्हा आपण जगात येतो म्हणजे आपला जन्म होतो तेव्हा जन्म झाल्याबरोबर आपण रडतो आणि बाहेर उत्सुकतेने आपली वाट पाहणारे सगळे जण हसत असतात. पण आपण जीवनात असं कार्य केलं पाहिजे कि, हे जग सोडतांना आपण हसत हसत जगाचा निरोप घेतला पाहिजे. आणि सारे जग रडले पाहिजे. देवानं म्हणावं - तथास्तु !

सुनंदा विष्णू कुळकर्णी
७५१७२८१६३९ 

Monday 11 May 2020

मातृदिन

आज जागतिक मातृदिन. तसं पाहिलं तर माझ्या आईला जाऊन अर्धशतक केव्हाच उलटुन गेलं. माझ्या संसाराचा फापटपसारा वाढला आणि आईची आठवण पुसट होत गेली. ती गेली तेव्हा मी फक्त ११ वर्षांची होते. शिशु वयातील ५ वर्षे सोडली तर उरलेली ५-६ वर्षे तीही नाकळत्या वयातली. आईचे सुख मला तसे मिळालेच नाही. आपल्याला आवडणारं एखादं मधुर पौष्टिक फळ सहज हातात यावं, ते खाण्यासाठी थोडा तुकडा तोडावा आणि ते‌ मजेत खात असताना त्याची मस्त चव जिभेवर रेंगाळत असतानाच ते फळ कुणीतरी हिसकावून दुर पळून जावं अगदी तसंच माझं आईच्या सुखाबाबत झालं. काय आहे ? अशा अर्धवट सुखाचा चटका जरा जास्तच जोरात बसतो. फोड येत नाही पण आग होत राहते.

आठवत नसलेल्या आईसाठी सुध्दा हृदयाचा एक कोपरा रिकामा असतोच. कशी असेल माझी आई ?मला सोडून जाताना तिला काय वाटलं असेल ? मी तिच्या उदरात असताना तिने माझ्याबद्दल काय ठरवलं होतं ? माझे किती लाड केले असते? मी कोण व्हावं असं तिला वाटतं होतं ? असे खुप सारे प्रश्न  मनात येतात...  म्हणजे एखाद्या सुंदर, मधुर फळाची चव तर मिळुच नये, पण ते बघायला सुध्दा मिळू  नये हा सल मनात सारखा सलत असतो. मग तो प्रत्येक स्त्रीमधे आई बघु लागतो. चिडणारी, रागावणारी प्रेम करणारी, जेऊ घालणारी, कडेवर घेणारी, शाळेत पोहोचवणारी, शाळेतुन परत आणणारी, अभ्यास घेणारी... प्रत्येक स्त्रीमधे तो आशाळभूतपणे आई शोधतो आणि खुप दुखावतो. एकुण काय सगळी वजाबाकीच. दोन्ही अवस्था सारख्याच मी आई झाले आणि माझं पहीलं मुलं मोठं होतं असतानाच माझ्या नजरेने ते बरोब्बर ओळखलं.

आज त्याच मातेचा दिवस. मे महिन्यातला दुसरा रविवार. आपल्या भारतात मात्र प्रत्येक दिवस मातृ-दिनच असतो. जागतिक मातृ-दिनाच्या सर्वांना मनापासून खुप खुप शुभेच्छा...!
Have a nice and loving day !

सुनंदा वि. कुळकर्णी
७५१७२ ८१६३९

Saturday 9 May 2020

रांगोळी


आज 'मदर्स डे' ! तसं 'डे' हि संस्कृती आपण मानत नाही कारण आपण कायम कृतज्ञता मानणारे भारतीय... परंतु कुठेतरी सुरवात करायची म्हणून आजचा दिवस. माझी आई ति. सुनंदा कुळकर्णी हिने आजपर्यंत अनेक लेख व कविता लिहिल्या आहेत. "छोट्या छोट्या दोस्तांसाठी छान छान कविता" हा तिचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. माझ्यात लिखाणाचा गुण हा तिच्याकडून आलाय.  तिने लिहिलेल्या  लेखांचाही संग्रह करावयाचा मानस आहे. त्यासाठी तिचे यापूर्वीचे व सध्या लिहीत असलेले लेख आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने हा ब्लॉग सुरु केला आहे. मध्यंतरी लिखाण कमी करून तिने खूप साऱ्या रांगोळ्या काढल्या. सर्व प्रकारच्या... आणि मग एक दिवस रांगोळी हा लेख... या लेखापासून सुरुवात करतो. आपल्या सवडीनुसार प्रतिक्रिया द्या, तिचा फोन नंबर पण दिलाय, फोन करा !

देवाची उपकरणे घासली. समई लावली. पुजेची तयारी केली. इतक्यात आण्णा (माझे सासरे) म्हणाले, "पोरी, रांगोळी नाही काढली ?" मी ओशाळले. पटकन देवघरात जाऊन रांगोळी काढली. भारतीय संस्कृतीत रांगोळीचे खुप महत्त्व आहे. अंगणात सडा-रांगोळी, तुळशीजवळ रांगोळी आणि पुजेआधी देवाजवळ रांगोळी सर्वच मराठी घरात काढली जाते. सडा टाकल्यावर रांगोळी शिवाय अंगण तसेच ठेऊ नये असे म्हणतात ते अशुभ असतं. सणावारी, दसरा, दिवाळी, चैत्रगौर, संक्रांत, हळदीकुंकू समारंभ असला की, गृहिणी येणाऱ्याच्या स्वागतासाठी स्वच्छ अंगणात सुंदर, सुबक रांगोळी काढतात. रांगोळी काढणे ही सुध्दा एक कला आहे. येणारा क्षणभर थबकला पाहीजे. रांगोळी ठिपक्यांची असो, देखावा असो किंवा पानाफुलांची वा नवीन प्रकारचीं असु दे त्यात सौंदर्य असतेच. प्रसन्न वाटतं.

माझी आई म्हणायची, "आपण देवाजवळ ज्या पारंपारिक रांगोळ्या काढतो त्या अंगणात काढु नये. त्या रांगोळ्यांवर अंगणात चुकून पाय पडण्याची शक्यता असते. कोणी मुद्दाम देत नाही केव्हा लहान मूल खेळताना पुसल्या जातात म्हणून काढू नये. कारण आपण त्यांना देवा इतकाच मान देतो. पण तरीही अंगणात रांगोळी हवीच." आता फ्लॅट सिस्टिम मध्ये अंगणाचा प्रश्न असला तरी आपण दाराजवळ थोडी आगेमागे रांगोळी काढतोच. तर अशी ही रांगोळी. भारतीय संस्कृतीची, भारताची शान. भारतीय गृहिणीच्या हातातली एक सुंदर कला. आता पुरूषही रांगोळी काढतात.

कला ही कोणा एकाची मक्तेदारी नाहीच मुळी. लग्नकार्यात वा मोठ्या समारंभात रांगोळी काढायला कलाकारांना बोलावले जाते. आणखी काय हवं ? महत्त्वाचं राहीलचं. सणावारी वा एखाद्या शुभ-प्रसंगी सर्वांच्या जेवणाच्या ताटाभोवती रांगोळी काढतात. विविध प्रकारची.सुंदर, मोहक. पुर्णब्रम्ह असणारी अन्न-देवता तर प्रसन्न होतेच पण जेवणाराही खुष होतो आणि उदरभरण-यज्ञकर्म यथास्थित पार पडते आणि मग मनोबल आरोग्य, सुखासमाधानाची सहज वृध्दी होते. वास्तुदेवता मनापासून शुभाशिर्वाद देते, हर्षभरीत होऊन म्हणते, तस्थातु.

सुनंदा वि. कुळकर्णी
७५१७२ ८१६३९

वेळा

गेलेली वेळ कितीही पैसे मोजले तयारी विकत घेता येत नाही आणि आलेल्या योग्य वेळेचा योग्य तो उपयोग करुन तीच फायदा घ्यायचा असेल तर त्या वेळेसाठी ए...